नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार म्हणजे लुटारूंची कंपनी आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल कराराचा संदर्भ देत ट्विटरवर केली आहे. राफेल विमानांचा करार म्हणजे ब्लॉकबस्टर सिनेमा आहे, अशी टीकाही केली आहे.
राफेल करारासंबंधीच्या ब्लॉकबस्टरमध्ये लष्कराच्या सैनिकांचे शौर्य आणि देशभक्ती पणाला लावण्यात आली आहे. मोदी आणि अंबानींचा हा सिनेमा एकदम ब्लॉकबस्टर ठरल्याचीही टीका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा एक कविता ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
राफेल करारात पंतप्रधान मोदींनी अनिल अंबानी यांचा फायदा होण्यासाठी फेरबदल केले असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तर पंतप्रधान मोदी चोर, चोरांचे सरदार आहेत, अशीही टीका त्यांनी केली. राफेल करारातील विमानांची किंमत यूपीएच्या काळात होती, त्यापेक्षा कैकपटीने वाढली आहे, असाही आरोप करण्यात आला आहे .