मोदींपेक्षा १० पट जास्त काम केले; केजरीवालांचे अमित शहाना खुल्या चर्चेचे आव्हान

0
570

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारने केलेली कामे आणि दिल्ली सरकारने केलेली कामे यांची तुलना केली आहे. मोदी सरकारपेक्षा १० पट जास्त कामं केल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी केलेल्या कामांबाबत खुली चर्चा करण्याचं आव्हान भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना दिलं आहे.

‘केजरीवालजी, या चार वर्षांमध्ये तुम्ही दिल्लीकरांसाठी काय काम केले? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा एकच मूलमंत्र आहे. खोटे बोलणे आणि वारंवार रेटून खोटे बोलणे,’ असे ट्विट भाजपाने केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना केजरीवालांनी, आरोग्य, शिक्षण, वीज-पाणी या क्षेत्रात आप सरकारने केलेल्या मूलभूत कामांचा दाखला दिला. त्यानंतर, ‘मोदीजींनी गेल्या चार वर्षांमध्ये जेवढी कामं केली त्यापेक्षा १० पट कामं आम्ही केली. मोदींनी जेवढी लोकविरोधी आणि चुकिची कामं केली, तसं आम्ही एकही केलं नाही. याच राम मैदानावर , या दिल्लीच्या जनतेसमोर तुम्ही केलेल्या कामांबबात एक खुली चर्चा करण्याचं मी तुम्हाला आव्हान देतो’ , असं  ट्विट केलं.

अमित शाह यांनी, ‘काँग्रेस सरकारने १३ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत पूर्वांचलच्या विकासासाठी केवळ ४ लाख कोटी रुपयांचा निधी दिला होता. मोदी सरकारने मात्र १४ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत ही रक्कम जवळपास तिप्पट करुन १३ लाख ८० हजार कोटी रुपयांचा निधी पूर्वांचलसाठी दिला. आम्ही वोटबँकेचं राजकारण करत नाही, आम्ही आमच्या पक्षापेक्षा देशाला जास्त महत्तव देतो’, असं म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना केजरीवाल यांनी ‘१४ व्या वित्त आयोगांतर्गत दिल्लीला केवळ ३२५ कोटी रुपयांचा निधी का दिला, असा प्रश्न केजरीवाल यांनी अमित शाहंना विचारला. दिल्लीमध्येही पूर्वांचलचे लोक राहतात. मग त्यांच्या विकासासाठी पैसे का नाही दिले? दिल्लीमध्ये राहणाऱ्या पूर्वांचलच्या लोकांसोबत भेदभाव का’, असा प्रश्नही केजरीवाल यांनी ट्विटरवरुन विचारला.