मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकून त्यांच्या करोडो फाॅलोवर्सना अनाथ करू नये – संजय राऊत

0
582

मुंबई,दि.३(पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांच्या या निर्णयाची उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया सोडू नये. कारण त्यांनी सोशल मीडिया सोडला तर त्यांचे करोडो फाॅलोवर्स अनाथ होतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकून त्यांच्या करोडो फाॅलोवर्सना अनाथ करू नये. असं करणं चांगलं नाहीये. मोदींचे करोडो फाॅलोवर्स म्हणजे त्यांचे सायबर योद्धे आहेत. सेनापतींच्या आदेशावर योद्धे काम करत असतात आणि सेनापतीच जर सोशल मीडियाचं मैदान सोडत असतील तर त्यांची फौज काय करणार?, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची सोशल मीडियात जोरदार क्रेझ आहे. त्यांच्या फेसबुक पेजला ४ कोटी ४७ लाख फाॅलोवर्स आहेत तर ट्विटरवर त्यांना ५ कोटी ३३ लाख लोक फाॅलो करत आहेत.,