नांदेड, दि. १२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने भरघोष मते दिली. मात्र, मोदींनी जनतेचा केसाने गळा कापला आहे, जनतेचा विश्वासघात केला आहे. त्याचमुळे मी त्यांच्या विरोधात प्रचार करतो आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) येथे सांगितले.
नांदेडमध्ये राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी मोदींवर जोरदार प्रहार केला.
यावेळी राज म्हणाले की, मोदींच्या विरोधात मी प्रचार करतो आहे, याचे कारण एकच आहे, ते म्हणजे माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. मोदींना एवढी चांगली संधी जनतेने दिली होती. मात्र या संधीची त्यांनी माती केली, जनतेशी ते कायम खोटंच बोलत आले आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही भाजपाच्या नेत्यांनी देशद्रोही म्हणणं कमी केले नाही, असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपले नौदल, पायदळ, वायुदल ही मोदींची सेना आहे, असे म्हटले आहे. योगी आदित्यनाथ अशी भाषा कशी काय वापरू शकतात? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. या भाषणाच्या वेळीही राज ठाकरेंनी मोदी जवानांच्या नावे कशी मते मागत आहेत, याबाबत एक व्हिडिओ क्लिप प्रसारित केली.
अमित शहा यांनी बालाकोटमध्ये २५० दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले. अमित शहा यांना कसे काय कळलं? हवाई दलाच्या प्रमुखांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी सांगितले की नेमके किती लोक मारले गेले ते आम्हाला सांगता येणार नाही. जो मदरसा उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जातो आहे, तो मदरसा सुरक्षित असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.