मॅट्रीमोनी साइटवर नोंदणी केलेल्या पुण्यातील १०२ उच्च शिक्षितांची दोन कोटींची फसवणूक

0
911

पुणे, दि. १२ (पीसीबी) – ‘मॅट्रीमोनी’ वेबसाइटवर विवाहासाठी नोंदणी करणाऱ्या विधवा, घटस्फोटित आणि तिशीनंतर लग्न करणाऱ्या महिला, ज्येष्ठ पुरुष, महिला अशांना लग्नाच्या आमिषाने जाळ्यात ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात ‘मॅट्रीमोनी’ साइटवर नोंदणी केलेल्या पुण्यातील १०२ उच्च शिक्षित महिला  आणि  पुरुषांची एकूण दोन कोटींची फसवणूक झाल्याचे  सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

शहरात नोकरी, कौटुंबिक कारणामुळे लग्न उशिरा करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे करिअरमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर अनेक महिला ‘मॅट्रीमोनी’ वेबसाइटवर लग्नासाठी नावनोंदणी करतात. तसेच, विधवा, घटस्फोटीत महिलादेखील या वेबसाइटवर दुसऱ्या लग्नासाठी नाव नोंदवितात. तर, काही ज्येष्ठ नागरिकदेखील दुसऱ्या लग्नासाठी वेबसाइटवर नोंदणी करत आहेत. विवाहविषयक नोंदणीच्या वेगवेगळ्या वेबसाइट आहेत. या साइटवर बनावट प्रोफाइल तयार करून सायबर चोरट्या या महिला व पुरुषांना जाळ्यात ओढत असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर करत आहेत.

सायबर चोरटेदेखील अशा वेबसाइटवर बनावट प्रोफाइल तयार करतात. त्यावर परदेशात मोठ्या पगाराची नोकरी असल्याची खोटी माहिती देतात. महिलांना ‘रिक्वेस्ट’ पाठवून त्यांच्याशी संपर्क वाढविला जातो. त्यानंतर विश्वास संपादन करून लग्नासाठी मागणी घातली जाते. महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर विविध कारणे सांगून महिलेकडे पैसे मागितले जातात. भारतात आल्यानंतर विवाह करून पैसे देण्याचे आश्वासन दिले जाते. तर, काही वेळेला परदेशातून मोठ्या रकमेचे गिफ्ट पाठविले असून ते कस्टमने पकडले आहे. ते सोडवून घेण्यासाठी महिलेला वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरायला लावले जातात. महिला पैसे भरत राहते. एके दिवशी गिफ्टही मिळत नाही आणि लग्नाचे आश्वासन दिलेल्या व्यक्तीचा संपर्क होत नाही. त्या वेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येते. मॅट्रीमोनी साइटवरून फसवणूक करणाऱ्या काही टोळ्यांना सायबर सेलने अटक केली आहे. त्यामध्ये काही महिला लग्नाचे आमिष दाखवून नंतर ब्लॅकमेल करत पुरुषांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत.

यामुळे मॅट्रीमोनी साइटवर ओळख झालेल्या व्यक्तीला भेटल्याशिवाय महिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच, कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.