मुलीच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने मजुराची आत्महत्या

0
439

औरंगाबाद, दि. १६ (पीसीबी) – मुलीचे लग्न जवळ आले मात्र पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने एका मजुराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.१४) औरंगाबाद जिल्ह्यातील नारेगाव ब्रीजवाडी येथे घडली.

नागेश काशिनाथ आठवले (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, नागेश आठवले हे मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मोठ्या मुलीचे येत्या रविवारी (दि.१८ नोव्हेंबर) रोजी लग्न होणार होते. त्यासाठी आठवले कुटुंबीयांकडून लग्नाची तयारी सुरू होती. मुलीचे लग्न जवळ आले तरी पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने नागेश आठवले गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. बुधवारी रात्री घरी कोणीही नसताना आठवले यांनी गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सिडको पोलिसांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सिडको पोलिस अधिक तपास करत आहेत.