Maharashtra

मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला सरकारकडून १० रोपे मोफत

By PCB Author

June 28, 2018

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासोबतच वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कन्या वनसमृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकारतर्फे मदत केली जाणार आहे. या योजनेचा दरवर्षी दोन लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होईल, असा अंदाज आहे.

पर्यावरणाचे संतुलन सांभाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून शासनातर्फे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीबाबत सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच महिला सक्षमीकरणही साधले जावे यासाठी वन विभागातर्फे एक विशेष योजना तयार करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला सरकारकडून १० रोपे विनामूल्य देण्यात येणार आहेत. त्यात ५ रोपे सागाची, २ रोपे आंब्याची आणि फणस, जांभुळ व चिंचेच्या प्रत्येकी एका रोपाचा समावेश आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच दिला जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत जन्म झालेल्या मुलींच्या पालकांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर त्यांना वन विभागाकडून १० रोपे उपलब्ध करून देण्यात येतील. लाभार्थींनी त्यांची लागवड १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत करावयाची आहे. या झाडांपासून मिळणारे उत्पन्न मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे.