कणकवली, दि. १२ (पीसीबी) – शिवसेनेवर आम्ही टीका करणार नाही, असा शब्द आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असे कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी म्हटले आहे.
नितेश राणे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळून एक पाऊल पुढे टाकले आहे. कटुता टाळण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आता चेंडू शिवसेनेकडे आहे. टीका करायची की नाही हा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे.
दरम्यान, राणे कुटुंबीय आणि शिवसेनेतील वाद किती काळ चालणार? बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला आदर आहे ना? मग पुढे वाद कशाला? मी नारायण राणे तसेच नितेश यांना सांगितले आहे की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करु नका. आता हा वाद संपवून टाका. आता जमले नाही तर दिवाळीनंतर हा वाद संपवून टाका, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.