मुख्यमंत्र्यांना आषाढी महापूजेसाठी जाता येत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव – जयंत पाटील

0
363

सांगली, दि. २३ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आषाढी महापूजेसाठी जाता येत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्क्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या ही १० लाखाच्या घरात आहे. या १० लाख वारकऱ्यांना चिरडण्याचे सामर्थ्य कुणाच्यात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. जयंत पाटील यांनी निशाणा साधला. महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासने दिली, ती त्यांनी पूर्ण करायला हवी होती. पण एखाद्या समाजाला बदनाम करण्याचे किंवा दूषणे देण्याचे सोडून आपण कुठे कमी पडलो यांचे आत्मचिंतन जर मुख्यमंत्र्यांनी केले, तर हे सारे प्रश्न सुटायला मदत होईल, असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपुरात दरवर्षी आषाढीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते. मात्र यासाठी मराठा समाजाचा विरोध होता. वारकऱ्यांच्या जीवाला धोका नको, म्हणून मुख्यमंत्र्यांनी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला.