मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या विधानावर कसा विश्वास ठेवायचा ?- अशोक चव्हाण  

0
839

नांदेड, दि. ६ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या घोषणेवर   कसा विश्वास ठेवायचा, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मेगाभरती स्थगित केल्याने अनेकांचे नुकसान होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.  

चव्हाण नांदेडमध्ये बोलताना म्हणाले की,  सध्या आरक्षणाच्या अनुषंगाने बेताल विधान केली जात आहेत. नारायण राणे, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रत्येकाची विधाने वेगवेगळी येत आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या जात आहेत. राज्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. मुख्यमंत्री म्हणतात नोकऱ्या देऊ, तर गडकरी म्हणतात नोकऱ्या आहेत कुठे. पण शासन सेवेतील २४ लाख जागा रिक्त आहेत, असा दावा अशोक चव्हाणांनी केला.

भाजप खासदार हीना गावित यांच्यावरील हल्ला निषेधार्ह आहे, मात्र, शासनाच्या वेळकाढू धोरणाचे हे परिणाम आहेत, असे अशोक चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत ३६ हजार जागांची मेगाभरती रद्द करण्याचे जाहीर केले होते. यावर अशोक चव्हाण म्हणाले,  मेगाभारती रद्द केल्यामुळे अनेक तरुणांचे नुकसान होणार आहे. अनेक तरुण वयोमर्यादा ओलांडतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतचा खुलासा करावा, असे चव्हाण म्हणाले.