मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या चिथावणीखोर विधानामुळे मराठा आंदोलन चिघळले – शरद पवार

0
690

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा तरुणांच्या मागण्यांची राज्य सरकारने योग्य दखल घेतलेली नाही. त्यामुळे ही उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याने हे आंदोलन चिघळले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी केला आहे. मराठा आंदोलनावर एका निवेदनाद्वारे पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सरकारने आंदोलनात सहभागी असलेल्या महत्वाच्या घटकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरु करावी. तर दुसरीकडे आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करता सर्वसामान्यांना आंदोलनाची झळ बसणार नाही, याची खबरदारी घ्यावी.  आत्तापर्यंत या आंदोलनाला असलेली जनतेची सहानुभूती कायम  ठेवावावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

मराठा समाजातील उच्च शिक्षित व सुस्थितीतील घटकांचा विचार केला नाही, तरी चालेल परंतू वंचित घटकांचा विचार करावा. मात्र, हे करताना एससी, एसटी, आदिवासी आणि ओबीसांच्या सवलतींना धक्का लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाचे प्रमाण पन्नास टक्क्यांवरुन जास्त होत असल्याने सांगत या आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. मात्र, तामिळनाडू राज्याचे उदाहरण पाहिल्यास तेथे सत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले जात आहे. याचा आधार घेत महाराष्ट्र सरकारने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडावी. त्याचबरोबर धनगर आणि मुस्लिमांमधील काही वर्गाची आरक्षणाच्या मागणीचाही सहानुभुतीने विचार करावा, असे पवार म्हणाले.