मुंबई, दि. ८ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील एकमेव चांगले पाहुणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या वर्षां बंगल्यावर जनावरे नेऊन बांधावीत. त्याठिकाणी जनावरांच्या चारापाण्याची सोय चांगली होईल, अशी उपरोधिक टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी चारापाणी नसेल, तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला चारा छाणवीवर बोलताना दिला होता. यावर शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. बाळासाहेब थोरात यांनीही त्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.
थोरात म्हणाले, राज्यभरात दुष्काळीची बिकट परिस्थती निर्माण झाली आहे. सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दुष्काळात सरकारने जनतेला धीर देणे गरजेचे आहे. तातडीने पिण्याचे पाणी, चारा, रोजगार हमीची कामे सुरू करणे गरजेचे आहे. दुष्काळ असल्याने कोणत्याही पाहुण्याकडे चारा व पाणी शिल्लक नाही. एकमेव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भरपूर पाणी आहे, तिथेच जनावरे नेऊन बांधा, अशी खोचक टीका त्यांनी केली.