Maharashtra

मुख्यमंत्री फडणवीस माझ्या मनातून उतरले आहेत – अण्णा हजारे

By PCB Author

February 04, 2019

अहमदनगर, दि. ४ (पीसीबी) – दिल्लीतील रामलीला मैदानावर लोकपाल व लोकायुक्तांसाठी आंदोलन केल्यामुळे सध्याचे सरकार सत्तेवर आले आहे. त्या आंदोलनामुळेच सत्तांतर झाले होते. त्याच जनतेसोबत सरकार गद्दारी करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर माझ्या मनातून उतरले आहेत. भाजपने तर माझा वापरच केला आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज (सोमवार) राळेगणसिध्दीत केली.  

अण्णांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. मात्र, सरकारकडून कोणतेही आश्वासन त्यांना दिलेले नाही. तर दुसरीकडे, सरकारने अण्णांच्या ९० टक्के मागण्या मान्य केल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांनी पत्रकार परिषदेत घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.   शब्द न पाळण्याच्या बाबतीत काँग्रेसने डॉक्टरेट केली आहे, तर भाजप ग्रॅज्युएट आहे. माझ्या ९० टक्के मागण्या मान्य झाल्याचे खोटे सांगितले जात आहे.

सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. मागण्या मान्य झाल्यानंतरही उपोषण करायला मला वेड लागले आहे का,’ असा सवाल अण्णांनी यावेळी केला.जनतेचा विरोध पत्करून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. मात्र, अनेकवेळा लोकायुक्त नेमण्यास सांगूनही त्यांनी काही केलेले नाही. त्यामुळे ते माझ्या मनातून उतरले आहेत, असे अण्णांनी सांगितले.