Maharashtra

मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होणार?

By PCB Author

December 17, 2018

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राफेलप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या काँग्रेसला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने देशभरात ७० पत्रकार परिषदा घेण्याचे नियोजन केले आहे. याचाच भाग म्हणून  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचे हैद्राबाद येथे आयोजन केल्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

फ़डणवीस राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या कंड्या अनेक वेळा पिकवल्या जातात. अभ्यासू व्यक्तिमत्व आणि हिंदी-इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व या त्यांच्या राष्ट्रीय राजकारणासाठी    जमेच्या बाजू सांगितल्या जातात. त्यातच देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद हैद्राबाद मध्ये आयोजित केली असल्याने या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या साडे चार वर्षात  आपल्या  कामगिरीची ठसा उमटवला आहे. आपल्या नेतृत्वाखाली त्यांनी राज्यभरातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपला नंबर एकचे स्थान मिळवून दिले आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी त्यांचे वजन वाढले आहे. या पार्श्वभूमीवर  फडणवीस राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा अधून मधून झडू लागल्या  आहेत.