मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे एकाच मंचावर

0
356

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : येत्या 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. राणेंची केंद्रीय मंत्रीपदी लागलेली वर्णी आणि जन आशीर्वाद यात्रेत राणेंना झालेली अटक या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपल्या प्रयत्नामुळेच चिपी विमानतळ सुरू होत असल्याचा दावा केला. त्यानंतर सोशल मीडियावरूनही शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये चिपीच्या श्रेयवादावरून चढाई सुरू झाली आहे.

येत्या 9 ऑक्टोबर रोजी 12.30 वाजता चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, स्थानिक खासदार आणि आमदारही उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे आणि राणे आमनेसामने येणार आहेत.

ज्योतिरादित्य ठाकरे हे विमानतळाचं उद्घाटन करतील. त्यासाठी मुख्यमंत्री हवाच असं काही नाही, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी आज पलटवार केला. कालच उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदें यांच्यात सकाळी 11 वाजता चर्चा झाली. यावेळी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला, असं सांगतानाच काल 11 वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला 12 वाजता फोन करून सांगितलं की, आम्ही 9 तारीख फिक्स केली. मी त्यांना सांगितलं तुमच्या सोयीनुसार तारीख ठरवा, असं राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांना बोलवायचं की नाही बोलवायचं याचा अधिकार राणेंना कुणी दिला?, राणे कोण लागून चालले? असा सवालही त्यांनी केला.

राणेंच्या विधानाशी भाजप असहमत?
दरम्यान, राणेंच्या विधानाशी भाजप नेते असहमती दर्शविताना दिसत आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. मी प्रोटोकॉल अधिकारी नाही, पण महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला असे वाटते की भले शिवसेनेचा प्रयत्नामुळे चिपी विमानतळ झालं नसेल, भाजपच्या मुहूर्तमेढी मुळे झालं असेल तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा सन्मान झाला पाहिजे. त्यांनी आलं पाहिजे असे माझे मत आहे, असं शेलार म्हणाले.

प्रोटोकॉल काय सांगतो?
विमानतळाच्या मालकीवरून शिवसेना आणि राणेंमध्ये जुंपली आहे. राणेंनी हे विमानतळ केंद्र सरकारच्या अधिपत्याखालीच असल्याचा दावा केला आहे. तर राऊत यांनी हा एअरपोर्ट एमएमआयडीसीचा आहे. पीपीपी मॉडेलवरील आहे. तो महाराष्ट्राचाच आहे. केंद्राने केवळ लायसन्स दिलं आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे, असं स्पष्ट केलं. मात्र, विमानतळाचा अधिकार कुणाकडेही असला तरी एखाद्या राज्यात एखाद्या प्रकल्पाचं उद्घाटन होत असेल तर त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना द्यावचं लागतं. कार्यक्रम पत्रिकेतही मुख्यमंत्र्यांचं नाव टाकावं लागतं. त्यामुळे केंद्र सरकारकडून मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण दिलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.