मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीला मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जैस्वाल आणि राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर उपस्थित होते.
या बैठकीत मुंबई आणि महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर मुंबईसह राज्यभर अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. अधिवेशनाच्या बंदोबस्तात ५ हजार पोलिस तैनात आहेत. याशिवाय मोर्चांसाठी १५०० पोलिसांचा बंदोबस्त आहे.
तसेच अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील आमदार विधानभवनात परिसरात एकत्र आले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण येतो. सर्व व्हीआयपी एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर जास्त संवेदनशील असतो, असे सांगितले जात आहे.
याबाबत निर्णय घेण्यासाठी गुरूवारी (दि.२८) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक विधिमंडळात बोलवण्यात आली आहे. सर्वांशी चर्चा करुन अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. देशातील परिस्थिती पाहता अधिवेशन गुरूवारीच रद्द होण्याची शक्यता आहे.