धुळे, दि. ४ (पीसीबी) – भाजपमध्ये गुंडांच्या टोळीचा प्रवेश झाला आहे. मुंबईत राजन गँग भाजपसाठी काम करत आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ मध्ये २० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मलिक धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नवाब मलिक धुळ्यात आले होते. यावेळी त्यांनी जयकुमार रावल यांच्यावर निशाणा साधला. पर्यटन विभागात १८ महिन्यात ६ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, या मागील नेमके कारण काय? असा सवाल यावेळी मलिक यांनी उपस्थित केला.
सध्या राज्यावर ५ लाख कोटींचे कर्ज असून सरकारने शिर्डी संस्थांकडून ५०० कोटींचे घेतले आहे. मंदिराच्या तिजोरीवर हात मारण्याचा राज्य सरकारचा हा कार्यक्रम आहे, अशी टीका मलिक यांनी यावेळी केली. दरम्यान, उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेले होते. याबद्दल मलिक यांनी ठाकरे यांचे कौतुक करून पाठराखण केली आहे.