मुंबईची तुंबई होताच अमृता फडणवीसांनी केलं ट्विट; म्हणाल्या…

0
272

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : दरवर्षी मुंबईत पाणी साचण्यावरुन राजकारण तापताना दिसतं. यंदाही पहिल्याच पावसाने नालेसफाईच्या आणि मुंबई तुंबल्याच्या वादाने डोकं वर काढलं आहे. पर्यटन मंत्री आणि युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी यंदा मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा केला होता. त्याचबरोबर शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेकडून नालेसफाई करण्यात आल्याचं म्हटलं होतं. मात्र पहिल्या पावसानेच मुंबईला वेठीस धरलं. मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत प्रशासनावर टीका केली आहे. मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यावर अमृता फडणवीस यांनी एक शेर ट्विट केला आहे. “जी तोंडापर्यंत उडत होती, आता पायांना चिकटली आहे. पाऊस पडताच मातीची नियत बदलून गेली,” अशा आशयचा शेर अमृता फडणवीस यांनी ट्विट केला आहे.

मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार पावसाची सुरुवात केली आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य रेल्वेची तसेच हार्बर मार्गावरील रेल्वेसेठा ठप्प झाली आहे. दरम्यान, मुंबई तुंबणार नाही असा दावा आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांकडून केला गेला होता. मात्र पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. यावरून अमृता फडणवीस यांनी टोला लगावला. दरम्यान, मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नाही. मात्र, चार तासात निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हटलं आहे. चार तासाच्या वर पाणी शहरात थांबत नाही, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं आहे असे महापौरांनी सांगितले.