मुंबईचा वीज पुरवठा अखेर सुरळीत

0
162

मुंबई, दि. १२(पीसीबी) – एरवी पावसामुळे ठप्प होणाऱ्या मुंबईतील लोकल सेवेला वीज पुरवठा खंडित झाल्यानं ब्रेक लागला होता. अखेर दोन तासानंतर हळूहळू वीज पुरवठा सुरळीत होत असून, लोकल सेवाही पूर्वपत सुरू होत आहे. सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरू झाली. त्यानंतर काही वेळानं मध्य रेल्वेची सेवाही सुरू झाली. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

महापारेषणच्या कळवा-पडघा जीआयएस केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज पुरवठा खंडीत झाला होता. अचानक वीज गेल्यानं कार्यालयांसह अनेक कामांना ब्रेक लागला. या खंडित झालेल्या विद्युत पुरवठ्याचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेलाही बसला. वीज पुरवठा खंडित झाल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाली होती. अखेर दोन तासांनी वीज पुरवठा हळूहळू सुरळीत होत केला जात असून, अनेक भागात वीज पुरवठा पूर्वपदावर आला आहे.

रेल्वे विभागानंही वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर लोकल सेवा सुरू केली असून, सध्या सीएसएमटी ते पनवेल या हार्बर मार्गावरच लोकल सेवा सुरू झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप खोळंबलेली असून, लवकरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कर्जत/कसारा या मार्गावरील सेवा सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मध्य रेल्वेची मुख्य मार्गावरील सेवा सुरळीत झाली असून, मुंबईतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या नवीन वेळापत्रकानुसार सोडण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

वीज पुरवठा बंद झाल्यानं विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची सेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे. पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ही माहिती दिली. पश्चिम रेल्वेच्या उपनगरांतही वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. १२.२० पासून पश्चिम उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं.