मुंख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा; विखे पाटलांची मागणी

0
467

नागपूर, दि. ६ (पीसीबी) – बिल्डर आणि अधिकारी यांच्या संगनमताने नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची जमीन कवडीमोल भावाने विकण्यात आली. या प्रकरणात मुख्यमंत्र्याचा थेट संबंध असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केली. या भूखंड गैरव्यवहारात राज्य सरकारचे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही विखे- पाटील यांनी केला.

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्याआधीच विखे-पाटील यांनी नवी मुंबईतील भूखंड घोटाळा प्रकरणी स्थगन प्रस्ताव आणून चर्चेची मागणी केली होती. मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्थगन प्रस्ताव नाकारत प्रश्नोत्तराच्या तासानंतर विखे- पाटील यांना बोलण्याची संधी दिली. त्यांनी नवी मुंबईतील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमीन विक्री व्यवहाराचे प्रकरण उपस्थित करून देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. नवी मुंबईतील भूखंडाचा व्यवहार रद्द करावा, तसेच या चौकशीवर प्रभाव पडू नये, म्हणून मुख्यमंत्र्यानी पदावरून दूर व्हावे, असे विखे-पाटील म्हणाले.

कोयना प्रकल्पग्रस्तांची खारघर येथील २४ एकर जमीन बिल्डरने विकत घेतली. त्यासाठी आठ शेतकरी निवडण्यात आले. बिल्डरने या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले. ज्या शेतकऱ्यांनी जमीन विकली, त्यांना रायगडचे जिल्हाधिकारी कोण हेच माहीत नाही. असे असताना या शेतकऱ्यांना रायगड जिल्हाधिकारी यांना भेटण्याचा सल्ला कुणी दिला, अशी विचारणा विखे- पाटील यांनी केली. प्रकल्पग्रस्तांची जमीन सिडको अंतर्गत येत असताना लिलावाची प्रक्रिया पार न पडता ही जमीन साडेतीन कोटी रुपयांना विकण्यात आली. अवघ्या दोन महिन्यांत हा व्यवहार झाला. अधिकारी- बिल्डर यांच्या संगनमताने झालेल्या २ हजार कोटींच्या गैरव्यवहारात कुणी हात धुतले, असा सवाल त्यांनी केला.