मुंबई,दि.(पीसीबी)-सत्तास्थापन करण्यात सर्व पक्ष असमर्थ ठरल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यावरुनही आता राजकारण सुरु झाले आहे. विविध पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीचे खापर एकमेकांवर फोडायला सुरुवात केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरुन शिवसेनेवर आरोप केलेत.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रपती राजवटीचे खापर मित्रपक्ष शिवसेनेवर फोडले. भाजप राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आज राष्ट्रपती शासन लागू झालं. काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा अनादार केला. शेतकरी संकटात असून राज्यात अनेक समस्या आहेत. जनादेशाच्या अनादरामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली, असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली. पुढे ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप शिवसेनेला पाठिंबा दिलेला नाही, किंवा त्यांच्या लोकांनी अद्याप शिवसेना नेत्यांची भेटही घेतली नाही, त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. जनादेश असल्यामुळे लवकर सरकार स्थापन व्हावे ही इच्छा होती. आम्ही कुठल्याही पर्यायाचा शोध घेतला नाही. पण आमच्या मित्रपक्षानं इतर पर्याय असल्याचं म्हटलं असल्याचंही ते सांगायला विसरले नाहीत.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना वेळेत सत्तास्थापना करण्यात अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याचं खापर आता एकमेकांवर फोडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरुन शिवसेनेवर आरोप केले आहेत. शेतकरी संकटात आहे, राज्यात अनेक समस्या आहेत. अशात काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा अनादर केल्यामुळं राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचे ते म्हणाले.