माहितीच्या अधिकाराखाली ग्रामपंचायतीकडे माहिती मागितल्याने भाजप कार्यकर्त्याचा चाकुने भोसकून खून

0
418

लातूर, दि. २२ (पीसीबी) – माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितल्याच्या कारणावरून निलंगा तालुक्यातील शिरोळ वंजारवाड्यात भर चौकात काँग्रेस कार्यकर्त्याने भाजप कार्यकर्त्याचा चाकुने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळच्या सुमारास घडली.

राजेंद्र रघुनाथराव जाधव (वय ३७) असे मयत भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश दिलीप जाधव या काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील शिरोळ वंजारवाडा येथील बस स्थानकावर आज सकाळी राजेंद्र जाधव हे चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी सुरेश जाधव याने पाठीमागून येऊन त्यांच्या पोटात चाकूने वार केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी राजेंद्रला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाकूचे वार खोलवर गेल्याने राजेंद्र जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी निलंग्याकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. राजेंद्र जाधव यांनी काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकाराखाली ग्रामपंचायतीकडे विविध बाबींची माहिती मागितली होती. याचाच राग मनात धरून सरपंच विश्वास जाधव यांच्या पुतण्याने ही हत्या केल्याची चर्चा परिसरात होत आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. मृत राजेंद्र रघुनाथराव जाधव यांचे शवविच्छेदन निलंगा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत असून रुग्नालय परिसरात नागरिकांची गर्दी आहे. या घटनेतील आरोपी सुरेश हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.