आळंदी, दि. २६ (पीसीबी) – किरकोळ कारणातून आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या त्यांच्या मावस भावानेच केली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्यांचा मावस भाऊ अजय संजय मेटकरी (रा. काळेवाडी झोपडपट्टी, पुणे) याच्याविरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार (दि.२७) पुणे-आळंदी रोडवर चऱ्होली येथे बालाजी यांची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी काळेवाडी झोपडपट्टीमध्ये एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बालाजी कांबळे गेले होते. त्या कार्यक्रमात त्यांचा मावस भाऊ अजय मेटकरीने बालाजी यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. तसेच भांडणानंतर अजय याने बालाजी यांना वारंवार मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे त्यानेच बालाजी यांचा खून केल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी दिघी पोलिसात दिली आहे. दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.