मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञाला खोट्या गुन्ह्यात अडकवले – अमित शाह

0
416

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याद्वारे जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले. कोर्टात त्यांचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले, अशा शब्दांत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची पाठराखन केली आहे. सोमवारी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शाह म्हणाले, स्वामी असीमानंद आणि इतर लोकांना खोटे खटले दाखल करुन आरोपी बनवण्यात आले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडण्यात आले होते त्यांना का सोडण्यात आले, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

दोन टप्प्यातील निवडणुकांनंतरच ममता दीदींना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसतोय त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये यंदा परिवर्तन होणारच, अशा शब्दांत शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच ते निवडणूक आयोगावर आणि विरोधकांवर टीका करीत आहेत. आमच्या नेत्यांच्या सभांना परवानगी न देणाऱ्या ममता दीदींनाच आता इथल्या जनतेनेच नाकारलं आहे. त्यांच्या सभांना गर्दी होत नाही, त्यामुळे आता त्या मतदारांच्या मनात भिती निर्माण करण्याचा हरऐक प्रयत्न करीत आहेत.

मात्र, आम्ही जनतेला सांगू इच्छितो की कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही आपण आपले मत निर्भिडपणे द्यावं. बंगालच्या जनतेने तृणमुलच्या दडपशाहीच्या वातावरणाला दूर सारण्याची आता वेळ आली आहे. वोट बँकेच्या खेळाने बंगालीच संस्कृती दाबण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या बंगालमध्ये पोलीस आणि बाबूशाहीच राज्य चालवत आहे. इथला औद्योगिक विकासाचा आलेख खाली घसरतोय. बंगालमध्ये लोकशाहीची हत्या होत आहे, असा आरोप यावेळी अमित शाह यांनी केला.

दरम्यान, देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही ठाम भुमिका घेतल्याचे सांगताना शाह म्हणाले, काश्मीर संदर्भातील कलम ३७० आणि ३५ ए विरोधात कडक पावले उचलणार, दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) देशभरात लागू करणार, सिटिझन अमेंडमेंड बिलमध्ये शरणार्थींना नागरिकता प्रदान करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.