Maharashtra

‘मालकाला खूश करण्यासाठी भास्कर जाधव असा प्रकार करत आहेत’; भाजप नेत्याची जहरी टीका

By PCB Author

July 26, 2021

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : “शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी तर विधानसभेत गैरवर्तन केलं होतं. काल जाहीर कार्यक्रमात त्यांनी तेच केलं. आपल्या मालकाला खूश करण्यासाठी हे करतात”, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला. भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणं मांडणाऱ्या महिलेला अरेरावीची भाषा वापरली होती. त्यावर शेलारांनी टीका केली. आशिष शेलार म्हणाले, “भास्कर जाधव आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असा प्रकार करत आहेत. त्यांनी आधी विधानसभेत गैरवर्तन केलं होतं, आता जाहीर कार्यक्रमात केलं”

झालेली दुर्घटना आणि यावर दीर्घकालीन तोडगा आणि शाँर्टटम मदत द्यायला हवी. त्यात सरकार कुचराई करत आहे. दिलदारी मुंबई आणि महाराष्ट्रानेही दाखवली पाहिजे. तर बॉलिवूडनेही दाखवावी याबाबत आम्हीही सहमत आहोत, असं शेलारांनी सांगितलं. यावेळी आशिष शेलार यांनी तुंबणाऱ्या मुंबईवरुन शिवसेनेवरही हल्लाबोल केला. शेलार म्हणाले, “आज 26 जुलै दुर्दैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा दिवस आहे. कित्येक वर्ष उलटूनही परिस्थिती काही बदलली नाही. एव्हढे वर्ष सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरी केली आहे. दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर”

कोकण आणि साताऱ्यातील परिस्थिती पाहतोय. चिखलाचे डोंगर, मृत्यूचं थैमान हे पाहून मुंबईत शिवसेनेला काही करावं असं वाटतं नाही. कोट्यावधी रुपयांचे प्रोजेक्टच्या नावाखाली १६ वर्षात ३ लाख २० हजार कोटीचा अर्थसंकल्प खर्च मुंबईकरांसाठी केला. मात्र खर्च करून चित्र काय.. तर तेच. मग हे पैसे गेले कुठे सत्ताधारी शिवसेनेला याचं उत्तर द्यावं लागेल, असं आशिष शेलार म्हणाले.

चितळे कमिटी, आयआयटीच्या अहवालाचं काय झालं? हे पैसे पाण्यात गेले आणि मुंबईकरांचे जीव टांगणीला लागले आहेत. मुंबईतले पानलोट क्षेत्र मोजलंय का? मिठीनदीवरील अतिक्रमण हटवलं का? पम्पिंग स्टेशनचं काय झालं? आयआयटी पवईचा अहवाल पाण्यात बहुदा भिजून गेला. जनतेकडून शिवसेनेकडे हिशोब मागण्याचं काम भाजप करेल, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.