चाकण, दि. १७ (पीसीबी) – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा भारतीय हवाई दलाने एअरस्ट्राईक करून बदला घेतला. ही कारवाई आमच्या सल्ल्यानेच केली, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. चाकण येथे राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत पवार बोलत होते.
पवार म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्वपक्षीयांची बैठक झाली. यावेळी मी पूर्वी संरक्षण मंत्री असल्याने पहिला प्रश्न मला विचारण्यात आला, त्यावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश भारतीय जवानांना द्या, असा सल्ला मीच दिला होता.
या बैठकीला मोदी उपस्थित नव्हते. ते महाराष्ट्रात यवतमाळच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मोदी इकडे बोलत होते, मैं चौकिदार हू, देश की सुरक्षा मेरे हात मे हैं. देश को कुछ होने नहीं दुंगा. तिकडे जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन हे बोलायचे सोडून ही ५६ इंचची छाती यवतमाळ मध्ये बोलत होती, अशा टीका पवार यांनी मोदींवर केली.