माझ्या भाषणामुळे काँग्रेसचे नुकसान होते – दिग्विजय सिंह

0
447

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – माझ्या भाषणामुळे काँग्रेसची मते घटतात, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. एककेकाळी काँग्रेसचे चाणक्य असलेले दिग्विजय सिंह यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात दिग्विजय सिंह हे आपल्या भाषणामुळे काँग्रेसचे नुकसान होते. त्यामुळे मी कोणत्याही रॅलीत किंवा जाहीर सभेत भाषण करत नसल्याचे म्हणताना दिसतात.

दिग्विजय सिंह हे दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जितू पटवारी यांच्या घरी गेले होते. त्यावेळी तेथून निघताना समोर काँग्रेसचे कार्यकर्ते आले. त्यावेळी दिग्विजय सिंह म्हणाले की, काम केले नाही तर फक्त स्वप्न पाहत राहाल. जर असे काम करत असाल तर सरकार बनणार नाही. शत्रुला जरी उमेदवारी मिळाली तरी त्याला विजय मिळवून द्या.

त्यानंतर स्वत:वर काँग्रेसकडून होत असलेल्या उपेक्षेबाबत अप्रत्यक्षपणे भाष्य केले. ते म्हणाले, माझे फक्त एकच काम आहे. कोणता प्रचार नाही, कोणतेही भाषण नाही. माझ्या भाषणामुळे काँग्रेसची मते घटतात. त्यामुळे मी कुठेही जात नाही. दरम्यान, दिग्विजय सिंह यांच्या या वक्तव्यामागे गटबाजीचे कारण असल्याचे मानले जाते. काही नेत्यांच्या मते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात कट रचला जात आहे.