माझे लग्न करून द्या, वाशिमच्या युवकाचे थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना साकडे

0
220

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – वाढती बेरोजगारी आणि सरकारकडून वेळेवर न होणाऱ्या नोकर भरतीच्या जात्यात भरडल्या जाणाऱ्या तरुणांची व्यथा एका पत्राने चव्हाट्यावर आणली आहे. वाशिमच्या एका तरुणाने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोकरी नसल्याने होणारी घुसमट मांडणार पत्र लिहिलं आहे. “मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, अशी मागणी या तरुणाने उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. गजानन राठोड असं या तरुणाचं नाव आहे. त्याने लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं असून, चर्चेचा विषय ठरलं आहे.

“माझं वय ३५ वर्ष असून, माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण गेल्या ७ वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पण कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी असावी ही अट असते. पण तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण झाले आहे,” अशी खंत वाशिमच्या गजानन राठोडने पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे.

गजानन पत्रात काय म्हटलंय?
माझे सध्या वय ३५ वर्ष झाले असून, आजपर्यंत माझे लग्न झालेलं नाही. त्याचं कारण असं की, मी मागील सात वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु काही ना काही, कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे त्यांची एकच मागणी असते की मुलगा जॉबवर पाहिजं.

आपण अजून कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण आहे. आपण मला एकतर जॉब द्यावा. अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे, ही नम्र विनंती.