नागपूर, दि. २० (पीसीबी) – गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली. या बैठकीत दोन मागण्या मान्य झाल्याचे आमदार कडू यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांच्या गावातील अत्यावश्यक सोयी त्वरित सुरु करण्यात येतील आणि गोसेखुर्द धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यासंदर्भातील मागणी मान्य करण्यात आली आहे. तसेच प्रकल्पग्रस्त आणि शासकीय अधिकारी यांची संयुक्त समिती संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करेल. त्यानंतर १५ दिवसात अहवाल सादर झाल्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. मात्र शासनाने आश्वासन पूर्ण केले नाही, तर पुढील आंदोलन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर करणार आहे, असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला.
दरम्यान, या मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी दुपारपासून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूरच्या आमदार निवासाचा ताबा घेतला होता. सरकार मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलक आमदार निवासातच राहतील, अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली होती.