‘महिलांच्या बाबतीत हे सरकार असंवेदनशील आहे कारण, महिला आयोगाची इथे….’: राष्ट्रीय महिला आयोगाचे राज्य सरकारला खडेबोल

0
341

मुंबई, दि.१२ (पीसीबी) : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईला सुन्न करणारी घटना शुक्रवारी पहाटे साकीनाका परिसरात घडली. एका ३४ वर्षीय महिलेवर टेम्पोचालकाने अमानुष लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर आता साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचं पथकं मुंबईत दाखल झालं आहे. महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

पीडितेच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली आहे. पोलिसांकडून संबधित घटनेची माहिती घेतली आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी सांगितले.

“ही दुर्देवी घटना आहे. मुंबईत गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु असताना भररस्त्यात अशी घटना घडते याचा अर्थ इथे आरोपी निरंकुश आहेत. आरोपींना कोणाची भीती नाही आहे. आरोपींच्या मनात भीती असती तर त्या रात्री अशी घटना घडली नसती. गेल्या काही दिवसांपासून अनेक घटनांची माहिती घेतली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आठवडाभरात अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामागे राज्यशासनाचा निष्काळजीपणा आहे. कायदेव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडल्या आहेत,” असे महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटले आहे. “संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. इथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. मला हे कळत नाही की सरकार इतकं असंवेदनशील कसं आहे की, त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही. जर ते असतं तर महिलांना न्याय मिळाला असता. महाराष्ट्रात राज्य महिला आयोग नसल्याने आम्हाला वेळोवेळी पोलिसांची मदत घ्यावी लागली. महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील आहे. यांना महिलांबाबत कोणतीही चिंता नाही आहे. राज्य सरकारने याबाबत उत्तर द्यायला हवं,” असे महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटले आहे.