महावितरणाच्या विरोधात मंगळवारी पिंपरीत ‘जन-आंदोलन’

0
314

– नागरीकांनी सहभागी होण्याचे जन आंदोलन समन्वय समितीचे आवाहन

पिंपरी,दि.19 (पीसीबी) : महावितरणने संपुर्ण शहरातील वीज ग्राहकांना अनियमित वाढीव बिले दिली आहेत. वीज बील न भरणा-या ग्राहकांचा वीज पुरवठा कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय अन्यायकारक पणे खंडीत केला जात आहे. यासाठी महावितरणने गुंडप्रवृत्तीचे ठेकेदार नेमलेले आहेत. हे ठेकेदारांचे कर्मचारी वेळी अवेळी येऊन वीज पुरवठा खंडीत करुन नागरीकांना मनस्ताप देत आहेत. महावितरणच्या या कारवाई विरुध्द पिंपरी चिंचवड महावितरण विरोधी जन आंदोलन समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी (दि. 23 फेब्रुवारी) नागरीकांचे जन आंदोलन पुकारण्यात आले आहे अशी माहिती आंदोलनाच्या मुख्य समन्वय डॉ. भारती चव्हाण, सह समन्वयक वैजनाथ शिरसाट, मधुकर बच्चे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

मंगळवारी सकाळी 11 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हे जन आंदोलन होणार आहे. या आंदोलन शहरातील सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन महावितरण विरुध्द आपला निषेध नोंदवावा असेही आवाहन समन्वय समितीने केले आहे.

कोरोना महामारीच्या काळात ॲन्टी कोरोना टास्क फोर्स आणि मानिनी फाऊंडेशनच्या वतीने महावितरण विरुध्द ऑनलाईन तक्रारी दाखल करण्याचे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दाखल झालेल्या तक्रारी डॉ. भारती चव्हाण आणि प्रतिनिधी मंडळाने वीज मंत्र्यांना भेटून दिल्या होत्या. त्यावेळी वीज ग्राहकांना दिलासा देऊ असे आश्वासन वीजमंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. तरी देखील जानेवारी महिण्यापासून पुन्हा महावितरणने अवास्तव वाढीव बिलांमध्ये दंड आकारुन वीज बीले दिली आहेत. वीज बील थकलेल्या ग्राहकांचा पुर्वसुचनेशिवाय वीज पुरवठा ठेकेदारांच्या गुंडांमार्फत खंडीत करण्यात येत आहे. महावितरणच्या या गैर प्रकाराविरुध्द नागरीक तक्रार द्यायला कार्यालयात गेले असता पहिले बील भरा आणि ऑनलाईन तक्रार करा. असे सांगून महिला भगिनींना अपमानीत करुन हाकलून दिले जात आहे.

लॉकडाऊन काळात आणि आता अनलॉक काळातही शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना आपला अभ्यास आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होणा-या ऑनलाईन – ऑफलाईन परिक्षांसाठी अखंडीत वीज पुरवठा आवश्यक आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील लाखो कामगार आपले बहुतांश काम ऑनलाईन करीत आहेत. लॉकडाऊन मुळे लाखो कामगारांचा रोजगार बुडाला आहे. सर्व उद्योग, व्यवसाय आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. रोजच वाढणा-या इंधनाच्या दरांमुळे महिलांना संसाराचा गाडा चालविणे अवघड झाले आहे. या सर्व कटकटींमुळे आता महिलांबरोबरच समाजातील सर्व घटक जसे की, व्यापारी, उद्योजक, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणारे सदनिका धारक, वाणिज्य वापर करणारे कार्यालयीन कर्मचारी यांच्यामध्ये महावितरणच्या कारभाराविरुध्द तीव्र असंतोष आहे. महावितरणच्या विरुध्दच्या या सर्व असंतोषाची प्रतिक्रिया मंगळवारीच्या जन आंदोलनात उमटणार आहे.

मंगळवारी या जन आंदोलनात सर्व वीज ग्राहकांनी, महिला भगिनींनी, उद्योजक, व्यापारी, व्यावयायिक व वाणिज्य वीज ग्राहक, ज्येष्ठ नागरीकांनी सहभागी व्हावे असेही आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.