महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात केवळ तीनच महिला मंत्री , मंत्रिमंडळात शिवसेनेच्या एकाही महिलेला संधी नाही

0
338

मुंबई, दि.३० (पीसीबी) –  महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळचा शपथविधी सोहळा विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला. मंत्रिमंडळातील ३६ जणांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महाविकासआघाडीच्या ३६ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

या मंत्रिमंडळात फक्त तीनच महिला नेत्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात शिवसेनेच्या एकाही महिला नेत्याचा समावेश नाही. काँग्रेसने सर्वाधिक दोन महिलांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. तर, एका राष्ट्रवादीच्या महिला आमदाराचा समावेश आहे.

काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.