Pimpri

महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ नये म्हणून शरद पवार लढत आहेत

By PCB Author

October 19, 2019

पिंपरी, दि.१९ (पीसीबी) – महाराष्ट्र पुन्हा चुकीच्या हातात म्हणजेच भाजपाच्या हातात जाऊ नये म्हणून शरद पवार लढवय्याप्रमाणे लढत आहेत असे खासदार अमोल कोल्हेंनी म्हटले आहे. अमोल कोल्हे पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. भोसरी येथे अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. महाराष्ट्राचे ठरलेय, वातावरण फिरलंय असाही नारा त्यांनी यावेळी दिला.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, आज ७९ वर्षाचे तरुण शरद पवार हे निसर्गालाही आव्हान देत सभा घेत आहेत. त्यांना निसर्ग मनाचा मुजरा करतोय, शरद पवार यांची लाट होती ती आणखी मोठी कृतज्ञतेची लाट तयार झाली आहे. ५५ वर्ष महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिल्यानंतर आज महाराष्ट्र पुन्हा चुकीच्या हातात जाऊ नये, भारतीय जनता पक्षाच्या हातात जाऊ नये म्हणून शरद पवार हे लढवय्या प्रमाणे लढत आहेत. हा महाराष्ट्र पवार यांना साथ दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, हेलिकॉप्टरला उड्डाणाच्या सर्व परवानग्या होत्या, ऐनवेळी सांगण्यात आले उड्डाण करू शकत नाही. पंतप्रधान यांच्या सुरक्षा कारणास्तव उड्डाणं रद्द करण्यात आली आणि त्या दिवशीच्या सहा सभा रद्द करण्यात आल्या. तेव्हा, फोनद्वारे मतदारांशी संवाद साधला. इतर नेत्यांना देखील सभा घेता आल्या नाहीत. इतर पक्ष्यांच्या नेत्यांच्या प्रचाराचा खेळखंडोबा होत असेल तर लोकशाहीला हे अनुसरून नाही असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.