मुंबई, दि. १४ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे नेतृत्व बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन त्याबाबत माहिती जाहीर करण्यात आली आहे. तसेच यावेळी एका अध्यक्षासह पाच कार्यकारी अध्यक्षांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. नितीन राऊत, डॉ. बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन या पाच जणांची कार्यध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्याध्यक्ष नेमणूक करताना पक्षाने प्रादेशिक संतुलन आणि जातीय समीकरणांचा विचार केल्याचे दिसून येत आहे. नितीन राऊत, यशोमती ठाकूर हे विदर्भातील नेते आहेत, विश्वजीत कदम पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, तर बसवराज पाटील मराठवाड्यातील नेते आहेत.