महाराष्ट्रात शरद पवारांमुळेच विखारी जातीयवाद – विनोद तावडे

0
469

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – ज्या वेळी छत्रपती संभाजीराजे यांना नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले त्या वेळी पवार म्हणाले होते की, जुन्या काळात छत्रपती फडणवीस नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना नेमत आहेत. त्यामुळे इतका विखारी जातीयवाद हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामुळेच पाहायला मिळाला, असा आरोप शिक्षणमंत्री व भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केला आहे.

शरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले. त्यांनी मुख्यमंत्रिपद, मंत्रिपदे स्वत: भूषवली. कुटुंबातील इतरांनाही पदे मिळवून दिली. पण त्या जातीसाठी शरद पवारांनी काहीच केले नाही. जे केले ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले, हे पवारांनी लक्षात ठेवावे. शरद पवार बहुधा हे विसरले आहेत की, आजकालच्या तरुणांना हे अजिबात आवडत नाही. विकासावर, प्रगतीवरच राजकारण केले पाहिजे, असा हा पुरोगामी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र मानतो, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर टिका करताना विनोद तावडे म्हणाले, “राहुल गांधींनी केरळमध्ये हिंदू परंपरेने पूजा केली. हा गांधी परिवारात मोठा चांगला बदल झाला आहे. एका बाजूला धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्मांना लांब ठेवायचे आणि विशिष्ट धर्माला जवळ करायचे, असे मानणारा गांधी परिवार आता विविध धर्मांच्या प्रथेप्रमाणे, पूजेप्रमाणे आपले भाग्य आजमावयला लागल्याचे चित्र पहिल्यांदा दिसले. पण आता हे मनापासून आहे की, केवळ निवडणुकांपुरते हे येत्या काळातच कळेल, अशी टीका त्यांनी केली.”