मुंबई,दि.३०(पीसीबी) – महाराष्ट्रात विरोधी पक्ष थयथयाट करून स्वत:चेच हसं करून घेतोय, अशा आशयाचे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचा अग्रलेखातून करण्यात आलं आहे.
पालघर येथे दोन साधूंच्या हत्येनंतर भारतभरात त्याविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. सत्ताधारी शिवसेनेविरोधात भाजपने जोरदार टीका केली . त्यानंतर आठवड्याभरातच उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात देखील दोन साधूंच्या हत्येने देश हादरून गेला. त्याच विषयावर अग्रलेख लिहीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पालघर साधू हत्येचे आरोपी पकडले गेले तसे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या साधू हत्याकांडाचे आरोपीदेखील अटकेत गेले. कारण दोन्ही राज्ये कायद्याची आहेत. फरक इतकाच की, महाराष्ट्रात विरोधी पक्ष जसा थयथयाट करीत आहे तसे चित्र योगी महाराजांच्या राज्यात दिसत नाही.राजकारणातील मानवी मनाचे हे नवे कंगोरे गमतीचे तितकेच गुंतागुंतीचेही आहेत. जनता गंमत बघत आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष गुंत्यात पाय अडकवून स्वत:चेच हसे करून घेत आहे, अशी टीका करत उत्तर प्रदेशची जनता या खेळास मुकली आहे, असं राऊत यांनी म्हटली आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशात साधूंच्या हत्येनंतर कोणा पुढाऱ्याचा उद्धार करून त्यास धार्मिक रंग देऊन पेटवापेटवीचे आंदोलन केले नाही. पत्रकारांवर स्वयंप्रेरणेने हल्ले घडवून, त्याचा तमाशा करून महाराष्ट्राप्रमाणे योगी महाराजांच्या राज्यातही आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाल्याचा बोभाटाही तेथील विरोधी पक्षाने केला नाही, असं म्हणत महाराष्ट्र भाजपवर त्यांनी निशाणा साधला आहे.