महाराष्ट्रात मोदी-शहांसारखे गुंड नाहीत, त्यामुळे फडणवीसांना घाबरायचे नाही – हार्दिक पटेल

0
1085

सांगली, दि. १६ (पीसीबी) – मोदी, फडणवीसांनी धनगर समाजाला केवळ आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे आता जर ते ऐकत नसतील तर त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे पटेल आरक्षणाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. येथे येण्यापूर्वी फडणवीस हे खूप ताकदवान असल्याचे आपल्याला सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना घाबरण्याचे कारण नाही, कारण महाराष्ट्रात मोदी-शहांसारखे गुंड नाहीत, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

धनगर आरक्षणासाठी सांगलीतील आरेवाडीत आज ( मंगळवारी) गोपीचंद पडळकर यांच्या गटाचा दसरा मेळावा आयोजित केला होता. यावेळी हार्दिक पटेल बोलत होते.

यावेळी पटेल म्हणाले की, जे लढतात, जे झुंजार असतात ते कधीही हारत नाहीत. मोठ्या काळानंतर का होईना पण ते जिंकतातच. आपण जर आपली आरक्षणाची लढाई नेटाने लढले तर आपला विजय निश्चित आहे. त्यामुळे या गाढवासारख्या नेत्यांना जागृत करण्यासाठी तुमचा समाज पुरेसा आहे.  भाजपवाले, राष्ट्रवादीवाले, काँग्रेसवाले  या गाढवांना आपण निवडून दिले आहे. गोपीचंद पडळकर यांची भेट झाली त्यावेळी त्यांना मी सांगितले होते की, या भाजपवाल्यांवर विश्वास ठेवू नका. कारण, ते भरवशाचे नाहीत. त्यांनी गुजरातमध्ये पटेल आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, असे यावेळी हार्दिक पटेल म्हणाले.