महाराष्ट्राच्या दोन वीरपुत्रांना साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप

0
546

बुलढाणा, दि. १६ (पीसीबी) – पुलवामा या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मलकापूरचे जवान संजय राजपूत आणि लोणारचे नितीन राठोड या दोन्ही वीरपुत्रांच्या पार्थिवावर आज (शनिवार) अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे! च्या घोषणा आणि साश्रू नयनांनी त्यांना निरोप देण्यात आला. दोन्ही वीरपुत्रांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मूळचे बुलडाण्याचे असलेले संजय राजपूत यांना अखेरचा निरोप मलकापूरमध्ये देण्यात आला. यावेळी मलकापूरवासीयांनी अलोट गर्दी केली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक मोठ्या संख्येने उभे होते. संजय राजपूत अमर रहे या घोषणांनी हा परिसर दुमदुमला. संजय राजपूत यांच्यानंतर त्यांची पत्नी, दोन मुले आणि दोन भाऊ असा परिवार आहे. संजय राजपूत यांना मानवंदना देण्यासाठी मलकापूरच्या मुस्लिम बांधवांनीही रॅली काढली होती.

नितीन राठोड यांच्या पार्थिव दुपारच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी  लोणारमध्ये दाखल झाले. राठोड यांच्या  अंत्यसंस्काराला पंचक्रोशीतील लोकांनी मोठी गर्दी केली  होती.  नितीन ऱाठोड यांना गावातील लोक दादा म्हणत होते. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात लोणारचा दादा शहीद झाला त्यामुळे गावातल्या प्रत्येक घरातला सदस्य जणू हरपला अशीच भावना गावकऱ्यांच्या मनात होती. त्यांनाही साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.