औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – महायुतीतील सहकारी पक्षांना आम्ही वाऱ्यावर सोडलेले नाही, ते अजूनही आमच्यासोबतच आहेत. येत्या रविवारी (दि. २४) कोल्हापुरात महायुतीची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे दिली.
औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेना युतीचा संयुक्त मेळावा झाला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या मेळाव्याला महायुतीतील घटक पक्षाचे नेते रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे या दोघांना शिवसेना-भाजपने वाऱ्यावर सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिवसेना-भाजप युती पक्की झाली आहे. फक्त शिवसेना आणि भाजपमध्ये थोडा दुरावा आला होता. तो आधी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला . येत्या २४ तारखेला कोल्हापुराला महायुतीची सभा होणार आहे, त्यावेळी आमचे सर्व साथीदार हजर असतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.