मल्ल्या अर्थमंत्र्यांबरोबर संगनमत करुन देशाबाहेर पळून गेला – राहुल गांधी

0
573

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात पळून गेलेला  उद्योगपती विजय मल्ल्याला आपण भेटलो नाही, हा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा खोटा आहे. तर मल्ल्या अर्थमंत्र्याबरोबर संगनमत करुन देशाबाहेर पळून गेला. हे सरकार राफेल, विजय मल्ल्यावर खोटे बोलत आहे. अर्थमंत्र्यांनीच मल्ल्याला देशाबाहेर पळून जाण्यासाठी मोकळीक दिली. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवारी) येथे केली.

पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मल्ल्या आणि जेटली यांच्यामध्ये भेट झाली. त्यावेळी काँग्रेस नेते पुनिया त्या ठिकाणी  उपस्थित होते.  अरुण जेटलींनी त्यांच्या ब्लॉगमधून आतापर्यंत झालेल्या सर्व बैठकांबद्दल माहिती दिली आहे. मात्र, याच भेटीबद्दल माहिती देणे त्यांनी का टाळले? अरुण जेटली खोटे बोलत आहेत, असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला.

काँग्रेस नेते पुनिया म्हणाले की, माझ्यासमोर अरुण जेटली विजय मल्ल्यांना भेटले. एका कोपऱ्यात उभे राहून दोघांनी चर्चा केली. १ मार्च २०१६ रोजी  संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही भेट झाली. या भेटीचे सीसीटीव्ही चित्रीकरणही उपलब्ध आहे. मी जर खोटे बोलत असेन तर राजकारण सोडून देईन, असे पुनिया यांनी सांगितले. दरम्यान, देश सोडून जाण्याआधी मी संसदेत अरुण जेटलींची भेट घेतली होती, असा गौप्यस्फोट विजय मल्ल्याने केला  आहे.