अहमदनगर, दि. २३ (पीसीबी) – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर यांनी प्रस्थापित उमेदवारांविरोधात दंड थोपटले आहेत. संजीव भोर यांनी शहरातील कार्यकर्त्यांसोबत घेतलेल्या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीसाठी उभे असलेले संग्राम जगताप आणि सुजय विखे हे धनदांडगे आहेत, असा आरोपही संजीव भोर यांनी यावेळी केला. जनतेला त्यांचे प्रश्न मांडणारा उमेदवार हवा आहे. तो आपण स्वतः असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. युती आणि आघाडीचे दोन्ही उमेदवार हे धनदांडगे आणि प्रस्थापित आहेत. घराणेशाहीचे वारसदार असून अनेक वर्षांपासून त्यांच्या घरात सत्ता आहे. राजकीय पदे आहेत. मात्र, सर्व सामान्य समाजाला आणि शेतकऱ्यांना हे लोक न्याय देऊ शकले नाही, असा हल्ला भोर यांनी चढवला.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यात बैठका घेतल्या. समाजाच्या सर्व घटकातील लोकांची मते आम्ही जाणून घेतले. प्रस्थापितांच्या विरोधात लढाई लढली पाहिजे, असे मत सर्व घटकातील लोकांकडून मिळाले. म्हणून शेतकरी, कष्टकरी, पिचलेल्या समाजाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मी पुढे येत आहे, असे संजीव भोर यांनी सांगितले.