मुंबई, दि. ११ (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान ज्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते गुन्हे मागे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर आज (मंगळवार) भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपण मराठा समाजासोबत असल्याचे सांगितले.
मराठा समाजाच्या आडून आंदोलनात काही समाजकंटकांनी हिंसा घडवली. मात्र, त्याचे खापर मराठा समाजाच्या डोक्यावर फुटले, त्यामुळे कारवाई होणार असेल तर न्यायाने व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
आपले घर म्हणजे महाराष्ट्र पेटवणारा कोणीही शिवरायांचा मावळा नसेल. काही लोकांना हिंसा केली, मात्र निरपराध तरुण, तरुणी, माता, भगिनी यांची धरपकड सुरु आहे. पुरावे असतील तरच अटक करावी. गुन्हे मागे घेतले जातील, असे सांगितले होते. मात्र, तसे आदेश कुठल्याही पोलिस ठाण्याला दिले नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.