मनोहर पर्रीकर राफेल प्रकरणाचा पहिला बळी – जितेंद्र आव्हाड

0
669

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे, असे धक्कादायक  विधान  राष्ट्रवादीचे नेते व आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.  गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. पण हे वास्तव आहे, असेही आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीशी  बोलताना म्हटले आहे.

राफेलची बोलणी सुरु झाल्यानंतर पर्रिकर अस्वस्थ झाले होते.  दिल्लीचे राजकारण  जमणार नसल्याचे  त्यांनी ओळखून गोव्यात परत जाऊन  मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनातील वेदना त्यांनी अनेक मित्रांना  बोलून दाखवल्या होत्या, असे आव्हाड म्हणाले.

दरम्यान, रविवारी  संध्याकाळी मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले.  गेल्या वर्षभरापासून  पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते.  त्यांनी त्याही अवस्थेत कर्करोगाशी झुंज दिली. मात्र, अखेर त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या   प्रतिक्रियेमुळे नवा वाद उभरण्याची शक्यता आहे.