मुंबई,दि.३० (पीसीबी) – मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आला आहे. मात्र, याला काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्य स्तरावर विरोध आहे, असे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केले आहे. मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचे पालन करत नाही, हिंसेचे राजकारण करतात. २०१४ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता, आताही त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला हवा, भाजपचे आणि त्यांचे जवळचे संबंध आहेत, असेही निरुपम म्हणाले.
मनसेकडे मते आहेत, का, असतील तर ते त्यांना लाभो, असे म्हणत मनसे महाआघाडीचा भाग होणार नाही, असे निरुपमांनी स्पष्ट केले. या प्रस्तावाचा महाआघाडीवर परिणाम होऊ नये, अशी आशा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्टपणे कळवण्यात आल्याचे निरुपम यांनी सांगितले.