मध्य प्रदेशातच जगणार आणि येथेच मरणार – शिवराजसिंह चौहान

0
872

भोपाळ, दि. १३ (पीसीबी) – मध्य प्रदेशात भाजपचा पराभव झाल्यानंतर १३ वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळणारे शिवराजसिंह चौहान यांनी केंद्रात जाण्याची चर्चा फेटाळून लावली आहे. सध्या तरी केंद्रात जाणार नाही. मी मध्य प्रदेशातच जगणार आणि येथेच मरणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

भाजपच्या पराभवानंतर चौहान आता केंद्रात जातील. २०१९मध्ये लोकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या सर्व चर्चा  चौहान यांनी फेटाळून लावल्या आहेत. मी केंद्रात जाणार नाही. मध्य प्रदेशातच जगणार आहे आणि मध्य प्रदेशातच मरणार आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २००८ आणि २०१३च्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलं होतं. ते १९९०मध्ये पहिल्यांदा बुधनी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर केंद्रातील राजकारणात त्यांनी पाऊल टाकले. १९९१ मध्ये विदिशामधून ते लोकसभेवर निवडून गेले. १९९६, १९९८, १९९९ आणि २००४मध्येही ते विदिशामधून निवडून आले होते. २००५ मध्ये ते मध्य प्रदेशचे भाजप अध्यक्ष झाले. नोव्हेंबर २००५मध्ये शिवराज यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सलग १३ वर्षे त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवले.