मध्यप्रदेशची जबाबदारी आता पंकजा मुंडेंकडे; विधानसभा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार करणार

0
577

नवी दिल्ली, दि.१९ (पीसीबी) : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना मध्यप्रदेशचं प्रभारी करण्यात आलं असून त्या मध्यप्रदेशातील विधानसभा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार करणार आहेत. राष्ट्रीय सचिव झाल्यानंतर पंकजा यांच्याकडे पहिल्यांदाच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

पंकजा मुंडे या दिल्लीत आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. निवडणुका लढण्यात भाजपचा हातखंडा आहे. मी मध्यप्रदेशची प्रभारी आहे. मी परवा मध्यप्रदेशात जाणार आहे. खंडवात निवडणूक सुरू आहे. तीन विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक सुरू आहे. मी त्याचा प्रचार करणार आहे. प्रत्येक नेत्याला आपले विभाग दिले आहेत. निवडणुकीची जोरात तयारी सुरू आहे. प्रत्येकजण काम करत आहे, असं सांगतानाच आमचा संकल्प हा अंत्योदयाचा आहे. राजकीय पावलं उचलतो तसं सामाजिक पावलंही उचलणार आहोत. त्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली, असं पंकजा यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील ओबीसीला आरक्षण मिळालं होतं. ते 50 टक्क्याच्यावर गेलं होतं. 50 टक्क्याच्यावरचं आरक्षण रद्द होणार असल्याची शंका असताना सर्वच्या सर्व आरक्षण रद्द झालं. त्यामुळे ओबीसींमध्ये संताप आहे. त्यावर आम्ही राजकीय आणि सामाजिक भूमिकेतून बोललो आहे. मराठा आरक्षणही रद्द झालं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात संताप आहे. इतर राज्यांनीही त्यांच्या पातळीवर आरक्षणाबाबत भूमिका घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं. घटनेत देशाचे आणि राज्याचे अधिकार क्लिअर आहेत. त्याप्रमाणे बदलत्या काळाप्रमाणे काही निर्णय घेतले पाहिजे. घटनेत काही अमेंडमेंट करण्याची गरज आहे. विधानसभेच्या लेव्हलवर काही बदल करता येतात ते केले पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील नेत्यांसह केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करणार आहेत. सहकाराच्या मुद्द्यावर ही बैठक होणार आहे. त्याबाबतची कल्पना नसल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं. मला मिटींगची कल्पना नाही. मी त्याच्यात नाही. पण हरकत नाही. सहकाराच्या मुद्द्यावर सहकार्य करायला कोणी तरी तयार असेल तर चांगलीच गोष्ट आहे, असं त्या म्हणाल्या. अमित शहा हे सहकार मंत्री झाल्यापासून त्यांच्याशी भेट झाली नाही. मी सहकाराची अभ्यासक नाही. फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी अभ्यास करूनच प्रपोजल आणलं असले. जे नुकसानीत कारखाने आहेत त्यांच्याबाबत भूमिका घेऊन कारखाना सुरू राहिला पाहिजे. निवडणुकांपुरता साखर कारखाना सुरू राहू नये. शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरू राहिला पाहिजे. सहकार क्षेत्रात काही बदल केले गेले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील सहकारावरही त्यांनी भाष्य केलं. राज्यात सहकार अडचणीत आहे. अनेक कारखान्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. मीही त्याचा भाग आहे. माझाही कारखाना प्रचंड आर्थिक नुकसानीत आहे. शेतकऱ्यांसाठी उस गाळप करताना शेतीवर आधारीत उद्योगांना वेगळी वागणूक न देता ऊसाचे भाव वाढवतो तसेच साखरेच्या आणि इथेनॉलच्या भावाबाबत निर्णय घेतला पाहिजे. जेव्हा अॅग्रोबेस्ड उद्योग चालवताना शेतकऱ्यांना समोर ठेवून निर्णय घेतो. पण त्याचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये नफा नाही मिळाला तर तो उद्योग तोट्यात जातो. पर्यायाने शेतकरीही अडचणीत येतो. साखर कारखानदारीची परिस्थिती आज तशीच आहे. नितीन गडकरींनी आम्हाला त्यावेळी मदत केली. त्यांनी साखरेचे भाव स्थिर केले. इथेनॉलसह इतर टॅक्सबाबत चांगले निर्णय घेतले. त्यांचाही सहकारात मोठा अभ्यास आहे, असं त्या म्हणाल्या.