मुंबई, दि. १८ (पीसीबी) – हिंमत असेल तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर ३७० कलम पुन्हा आणू, असे बोलून दाखवावे, असे थेट आव्हान भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे. मतांच्या लालसेपोटी पवारांना मोतीबिंदू झाला आहे, असेही शहा म्हणाले.
राजुरा येथे आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
अमित शहा म्हणाले की, हा छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि टिळकांचा प्रदेश आहे. येथेच स्वराज्यासाठी लढाई सुरु झाली होती. आणि हे लोक आम्हाला महाराष्ट्र आणि ३७० चा काय संबंध अशी विचारणा करतात. पवारजी तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. मतांच्या लालसेपोटी तुम्हाला राज्यातील लोकांना काय हवं आहे हेदेखील माहिती नाही.
भाजप कार्यकर्ते एक दिवस आधीच २४ ऑक्टोबरला राज्यात दिवाळी साजरी करतील, असे सांगून महाराष्ट्रात एकीकडे भाजप मोदींच्या नेतृत्त्वातील देशभक्तांचा पक्ष आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि शरद पवारांची घराणेशाही असणारा पक्ष आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली.