मंदिर बांधण्यापेक्षा गरीबांच्या तोंडात दोन घास घाला – नाना पाटेकर

0
1038

पुणे, दि. २ (पीसीबी) – राज्यातील दुष्काळामुळे शेतकरी होरपळत आहे. मराठवाड्यात एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला. तर मराठवाड्यातील जनावरांना आणि माणसांना हातभार लागेल. नाइलाजाने गावाकडील लोक आज शहरात येत आहेत, ती भिकारी नाहीत. त्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याचे आज (रविवार)  उद्घाटन करण्यात आले. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते हे उदघाटन झाले. यावेळी नाम फाऊंडेशनकडून ५ पोकलन या उपक्रमासाठी देण्यात आले.

आपल्याकडे राम मंदिरावर चर्चा होते, मात्र दुष्काळावर चर्चा का होत नाही? या  प्रश्नावर नाना म्हणाले की,   कुणी काय करायचे हे त्यांच्यावर आहे. मला जे करावेसे वाटते ते मी करतो. गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल. त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधयाचे असेल तर बांधा. पण मला जे काम करायचे आहे, मी करत आहे, असेही ते म्हणाले.