“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला

0
257

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्यातील किंवा आपल्या विरोधातील लोकांना गप्प केलं जात असल्याची टीका सातत्याने भाजपावर केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ईडी, सीबीआय किंवा आयकर विभागाने गेल्या काही दिवसांत राज्यातील नेते आणि सेलिब्रिटींवर केलेल्या कारवाईकडे पाहिलं जात आहे. त्याबाबत आज ओबीसी परिषदेत बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी खोचक शब्दांत तुफान टोलेबाजी केली. तसेच, भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं, असा उपरोधिक सल्ला देखील त्यांनी उपस्थितांना दिला. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

ओबीसी परिषदेमध्ये राज्यातील ओबीसी नेत्यांनी जाहीर आणि आक्रमक भूमिका मांडल्या. मात्र, त्याविषयी बोलताना आपल्या भाषणात छगन भुजबळ यांनी तुफान कोट्या करत उपस्थितांची दाद मिळवली. “इथे सगळे जण अनेक मुद्द्यांवर जोरजोरात बोलले. चर्चा केली. पण सावध राहा बाबा. उद्या इन्कम टॅक्स घरी नाही आला म्हणजे झालं. जो जो या कामात येईल, त्याला बरोबर उस चरख्यात टाकून रस काढला जातो, तसं काढायचं काम असतं हे. आता सध्या खडसे साहेबांच्या पाठिमागे ते लागले आहेत”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

दरम्यान, आपल्या बोलण्यामुळे जे घाबरले असतील, त्यांनी भाजपात जावं, असा खोचक सल्ला त्यांनी दिला. “हे सगळं असं होत असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आपण जेव्हा एखादी भूमिका मांडतो, तेव्हा सावध राहा सगळे. जे घाबरले असतील, त्यांनी ताबडतोब भाजपामध्ये जायचं. मग तुम्हाला सगळं माफ. खरं तेच सांगतोय”, असं भुजबळ म्हणाले.

दरम्यान, राज्यातील ओबीसी मंत्र्यांवर देखील छगन भुजबळांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. “आत्ताच हे गुलाबराव पाटील बोलले. मंत्रिमंडळात देखील ते माझ्या पाठिशी ओबीसीच्या मुद्द्यावर बोलतात, त्याबद्दल त्यांचे आभार. ओबीसी मंत्री देखील खूप आहेत. मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही. पण बोलणारे फार थोडे आहेत”, असा टोला भुजबळांनी यावेळी लगावला.

यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी तुरुंगात घालवलेल्या दिवसांची देखील आठवण सांगितली. त्या वेळी कपिल पाटील यांनी आपला जीव कसा वाचवला, याविषयी ते बोलले. “कपिल पाटील यांनी माझा जीव वाचवला. जेलमध्ये जेव्हा मला टाकलं तेव्हा एकदा फार गंभीर प्रकृती झाली होती. तिथे सोपी गोष्ट असते. कुणाातरी जेलमध्ये टाकायचं. तो आजारी पडला की त्याच्याकडे बघायचं नाही आणि एक दिवस गेल्यावर म्हणायचं की हार्ट अटॅकने गेला. संपला विषय. पण जेव्हा कळलं की भुजबळ एकदम सीरियस आहेत, तेव्हा हे कपिल पाटील विधानमंडळात उभे राहिले. म्हणाले, तुम्ही काय वागणूक देत आहात त्यांना. हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत, नीट काळजी घेत नाहीत. तिथे मारून टाकणार की काय तुम्ही? नंतर शरद पवारांनी पत्रच पाठवलं, की भुजबळांना काही झालं, तर हे सरकार जबाबदार राहील. सुदैवाने मी बाहेर आलो”, असं भुजबळ म्हणाले.

दरम्यान, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा उल्लेख करतानाच छगन भुजबळांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिला अथर्वशीर्ष पठण करत असल्याचा उल्लेख केला. “दगडूशेठ गणपतीला आमच्या हजारो भगिनी अथर्वशीर्ष म्हणतात. त्या जागेपासून अगदी जवळच सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी सुरू केलेली पहिली शाळा आहे. पण तिथे एकही महिला गेली नाही. एकाही माझ्या भगिनीला वाटलं नाही की तिथे जाऊन डोकं टेकावं. त्यांनी शिकवलं म्हणून तुम्ही अथर्वशीर्ष वाचू शकलात. प्रचंड अंधश्रद्धा आणि ती धर्माच्या अफूची गोळी आज सगळ्यांवर राज्य करतेय”, असं भुजबळ म्हणाले.