भारत-पाकमधील तणाव वाढणार नाही – डोनाल्ड ट्रम्प

0
565

व्हिएत्नाम, दि. २८ (पीसीबी) – भारत-पाकमधील तणावपूर्ण परिस्थिती लवकरच निवळेल आणि सैनिकी कारवाया बंद होतील,  असा विश्वास  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. व्हिएत्नाम येथे उत्तर कोरियाचे प्रमुख किम जॉंग उन यांच्यासोबत आयोजित परिषदेनंतर ट्रम्प माध्यमांशी बोलत होते. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानी लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसली. यानंतर भारताच्या एका विंग कमांडरलाही पाकिस्तानने ताब्यात घेतले. दोन्ही देशांमधील तणाव वाढत गेला. पण आता या दोन्ही देशांमधील तणाव निवळत आहे, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे.

या दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास त्याचे परिणाम वाईट होतील.जगातील कोणत्याच देशाला या दोघांमध्ये युद्ध व्हावे, असे वाटत नाही. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या आम्ही संपर्कात आहोत. युद्ध होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न फलदायी ठरत आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.